वर्धा : क्षुल्लक कारणावरून वाद करून थेट रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणात सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती. तर आता शहर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याने अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.कुंदन रुपचंद कोकाटे रा. जुनी वस्ती सेवाग्राम हा एम.एच.३३ जी. ०६२६ क्रमांकाची रुग्णवाहिका पशेंट आणण्याकरिता शास्त्री चौक येते जात होता. अशातच त्याला फोन आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर तो वाहन उभे करून बोलत होता. दरम्यान संघर्ष लोखंडे हा त्याच्या तीन साथीदारासह तेथे आला. त्याने कुंदन याला तुझा मालक तन्मय मेश्राम याने माझ्या बहिणीला पळवून नेले. ते कुठे आहेत, अशी विचारणा करून वाद केला. हाच वाद विकोपाला जाऊन आरोपींनी कुंदन याला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुंदनच्या ताब्यातील रुग्णवाहिका बळजबरी हिस्कावून घेत कुंदनसह रुग्णवाहिका निर्जनस्थनी नेण्याचा प्रयत्न केला. अशातच कुंदनने कसाबसा रुग्णवाहिकेतून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी रुग्णवाहिका निर्जनस्थळी नेऊन तिला आगीच्या हवाली केले. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यावर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संघर्ष सुनील लाखंडे (१८) आणि बादल सुनील लुथडे (२१) रा. मदनी यांना अटक केली. पण गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार होते. त्यांचा शोध घेऊन त्यांना शहर पोलिसांनी आता अटक केली आहे. शुभम कमलाकर आगलावे (२०) आणि तुषार सुनील अतकर (१९) दोन्ही रा. मदनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
