मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक २८/०४/२०२२ रोजी शब-ए-कद्र, दिनांक ०१/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र दिन, दिनांक ०३/०५/२०२२ रोजी रमजान ईद (चंद्र दर्शनानुसार १ दिवस मागे पुढे) व अक्षय तृतीया अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांचे जिवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी तसेच समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे. या करिता श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाईंदर वसई-विरार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) अन्वये मनाई आदेश लागू करून
खालील बाबींना प्रतिबंध केलेला आहे.
१. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बाळगणे.
२. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.
३. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
४. व्यक्तींच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
५. सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वादय वाजवणे.
६. सभ्यता अगर निती या विरूध्द असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथुन पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे. ७. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
सदरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागु राहणार नाही.
“जो कोणी इसम सरकारी नोकर आहे किंवा ज्यास वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्र घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याने सुट दिलेली आहे.”
त्याच प्रमाणे सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागु असणार नाहीत.
१. लग्न कार्यासाठी जमलेले लोक.
२. प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
३. सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेरी येथे जमलेले लोक.
४. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला समुदाय.
५. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदानकेलेल्या पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.
६. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेली ठिकाण.
सदरील मनाई आदेश हा मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राकरिता दिनांक २७/०४/२०२२ रोजीचे ००.०१ वाजे पासुन ते दिनांक ११/०५/२०२२ रोजीचे २४.०० वाजे पर्यंत अंमलात राहील. सदर मनाई आदेशाचा भंग करणा-या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
